आधुनिक वाल्मिकी ग.दि.माडगुळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन


 ग.दि.माडगूळकर - गदिमा 


आज १ ऑक्टोबर,गदिमांची ९५वी जयंती. 

या महाकावीचा जन्म आपल्याच शेटफळे गावी झाला.  गदिमांचे धाकटे बंधू डॉ.अंबादास माडगूळकर यांच्या शब्दात सागितलेली 

त्यांच्या जन्माची कहाणी. या कहाणी मध्ये आपल्या गावाचा उल्लेख आहे.


गदिमांना जन्मताच मृत घोषित करण्यात आले होते,लहान मूल असल्यामुळे दफनासाठी खड्डाही खोदण्यात आला,पण सर्वात वर बसलेल्या पटकथाकाराची 'पटकथा' सूरु होण्याआधीच कशी संपेल!,गदिमांच्या जन्माची रंजक कथा.....

आपल्या हिंदू संस्कृतीत 'व्दिज' (दोन जन्म) ही संकल्पना आहे.आपण प्रथम मातेच्या पोटातून गर्भअवस्थेतून जेव्हा बाहेर येतो तो आपला पहिला जन्म,पुढे वर्णानूसार माणूस जेव्हा ज्ञान,शिक्षण,संस्कार प्राप्त करतो व आपल्या आत्म्याची खरी ओळख करुन घेतो तो त्याचा दूसरा जन्म मानला जातो म्हणून आपण 'व्दिज',गदिमा स्व:ताला 'त्रिज' म्हणायचे कारण त्यांचा तीनदा जन्म झाला होता!.

त्यावेळचा सातारा तर आत्ताच्या सांगली जिल्हातले '#शेटफळे' हे गदिमांचे आजोळ,हे गाव #गायकवाडांचे,#अस्सल #मराठी #वस्ती,तीथे शेंबड्यामेकड्याचे नावसुध्दा 'आबासाब,तात्यासाब',गावात ब्राम्हण कुळकर्णी टिकायचाच नाही,कुळकर्ण पद कोणी स्वीकारले की होळी-दिवाळी गाठून त्याचा खून पडलाच समजा!,गदिमांचे आजोबा (आईचे वडील) त्या गावचे कुळकर्णी.

गदिमांच्या आधि सर्वात मोठी बहिण,नंतर झालेला मुलगा पाळण्यातच वारला त्यामुळे गदिमांच्या आईने नुसती खडी साखर खाऊन सोळा सोमवार केले,मुलगा झाला पण तो जन्मताच मेलेला....

'१ ऑक्टोबर १९१९' हवा बिघडलेली होती,जोरात पाऊस पडत होता (माणदेशात पाऊस दुर्मिळ तिथे अशी कथा प्रचलित आहे की 'राम-लक्ष्मण-सीता' वनवासात असताना तीथे आले होते व झाडाखाली जेवायला बसले,तितक्यात पाऊस आला,रामाला राग आला व त्याने जो बाण मारला त्यानंतर माणदेशात जो पाऊस गायब झाला आहे तो आजगायत!.),लाडकी लेक 'बनूताई' प्रसूती वेदना सोसत होती,बाहेर चिंताक्रांत वडिल (गदिमांचे आजोबा) फेर्‍या मारत होते,त्या काळात प्रसुति घरातच होत असत व हे काम बेमालूम पणे सुईणी किंव्वा गावातली जाणती स्त्री करत असे.

प्रसूती करणारी प्रोढ स्त्री बाहेर आली,कोणीतरी अधिरपणे विचारले...

"काय झालं?"

"झालं,पण देवाने दिलं ते कर्मानं नेलं!."

"व्यंकोबाची मर्जी" असे म्हणत गदिमांचे आजोबा उठले.

"बाळंतिणिला सांभाळा,तो मासांचा गोळा परसदारी निजवून टाका..".

परसदारी खोरी-कुदळी वाजायला लागल्या,खड्डा तयार होऊ लागला,आईला अजून पूर्ण जाग आली नव्हती,इकडे मात्र म्हातारी सुईण मात्र चिंताक्रांत झाली होती.बाजेवरचे पोर तासाभरात मातीखाली दडपले जाणार होते.

शेवटचा प्रयत्न म्हणून तीने शेगडीसाठी केलेला विस्तव तव्यावर घेतला आणि बाळाच्या बेंबीजवळ नेला,आणि काय आश्चर्य बाळाने टाहो फोडला "कोहम कोहम...."

"मूल जिवंत आहे......मूल जिवंत आहे...." सगळी कडे आरडाओरडा झाला,गावभर आरोळी उठली.सगळी कडे आनंदी आनंद झाला.दफनासाठी खणलेला खड्डा धरणीला आस लागू नये म्हणून जिंवंत कोंबडयाने बुजवण्यात आला,आणि गदिमांचा पुनर्जन्म झाला...गदिमा 'त्रिज' झाले...

"गजाननाची" पटकथा आत्ता तर सुरु झाली होती....कारण पुढे एक महाकवी जन्माला येणार होता!.

Comments