*९ जानेवारी*
*प्रवासी भारतीय दिवस*
आपण ज्यांना एन.आर.आय. (Non Resident Indians- अनिवासी भारतीय) म्हणतो त्यांचा म्हणजे प्रवासी भारतीयांचा आज दिवस. ९ जानेवारी १९१५ रोजी एस.एस. अरेबिया या बोटीने कस्तुरबा व गांधी मुंबई बंदरात दाखल झाले. द.आफ्रिके मध्ये भारतीयांच्या हक्कासाठी त्यांनी दिलेल्या लढ्यामुळे म.गांधी बद्दल लोकांच्या मनात औत्सुक्य वाढले होते. या गांधीजींच्या परतीच्या प्रवासाच्या दिवसाला 'प्रवासी भारतीय दिन' म्हणून ओळखले जाते.
जगभरात ‘वसुधैव कुटुंबकम’ हा मंत्र रुजावा, यासाठी भारतीयांना शक्तिशाली आणि प्रभावशाली भारत हवा आहे. अनिवासी तरुण भारतीयांना आपल्या मातृभूमीतील संस्कृतीची ओळख निर्माण व्हावी, तसेच स्टार्ट अप, पर्यटन आणि शैक्षणिक आदी क्षेत्रांत कार्यरत सव्वा तीन कोटी अनिवासी भारतीयांना आपल्या संस्कृतीशी जोडण्यासाठी भारतात दर दोन वर्षानी प्रवासी भारतीय संमेलन घेतले जाते.
पुर्वी परदेश म्हटले की, अमेरिका, ब्रिटन आणि बोटावर मोजण्याइतक्या राष्ट्रांची नावे घेतली जायची.
आता तशी परिस्थिती राहिली नाही. माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय, बांधकाम व्यवसाय, हॉटेल व्यवसायाच्या निमित्ताने लाखो भारतीय नागरिक परदेशात राहतात. परदेशात भारतीयांचे कार्यक्षेत्र आणि वास्तव्याचा मोठय़ा प्रमाणात विस्तार झाला आहे. पाश्चात्य राष्ट्रात तर भारतीय नागरिक अत्यंत प्रभावशाली आहेत.
आपल्या कर्तृत्वाच्या बळावर भारतीय नागरिकांनी एक अढळ स्थान निर्माण केले आहे. आखाती राष्ट्रात तर भारतीयांची संख्या मोठी आहे. स्वातंत्र्याच्या आधी ब्रिटिश, फ्रेंच आणि डच सरकारांनी अक्षरशः गुलामाप्रमाणे या नागरिकांना आपल्या देशात नेले होते. गुलामगिरी व वेठबिगारी विरुद्ध कायदा केल्यानंतर शेतजमिनी कसण्यासाठी कामगारांनी कमतरता निर्माण झाली होती. ही कमतरता दूर करण्यासाठी आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू आदी राज्यांतून भारतीय कामगारांची कुटुंबे दक्षिण आफ्रिका व इतर राष्ट्रात नेण्यात आली होती.
गेल्या वर्षी बेंगळूर येथील प्रवासी भारतीय दिवस या कार्यक्रमात वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिकेहून अनेक भारतीय वंशाच्या नागरिकांनी कार्यक्रमात भाग घेतला होता. या कुटुंबीयांच्या आजच्या पिढीतील तरुणा मध्ये पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कास्टा यांचे पूर्वज गोव्याचे. सुनाम गणतंत्रचे उपाध्यक्ष (दक्षिण अमेरिका) मैकेल अश्विन अधीन हेही भारतीय वंशाचे आहेत. केवळ व्यवसाय उद्योग धंद्यातच नव्हे तर अथक परिश्रम, चिकाटी, प्रामाणिकपणाच्या जोरावर भारतीय नागरिकांनी आपण राहत असलेल्या देशाच्या राजकारणावरही आपली पकड दृढ केली आहे.
सर्व परदेशी असलेल्या भारतीयांना प्रवासी भारतीय दिवसाच्या शुभेच्छा !

Comments
Post a Comment